‘भविष्यातील वाटचालीसाठी नाविन्याचा विचार आवश्यक’

“महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे’ या बोधवाक्याला अनुसरून गेल्या १६० वर्षात उत्तम कामगिरी केली आहे. विद्यार्थी घडविताना संस्थेच्या सर्व घटकांमध्ये आत्मीयता निर्माण झाली आहे, म्हणूनच विशाल स्वरुपाचा ‘मएसो परिवार’ आकाराला आला आहे. १६० वर्षांच्या दैदिप्यमान वाटचालीनंतर आता पुढील वाटचाल करताना संस्थेने नाविन्याचा विचार केला पाहिजे. शौर्य, सांस्कृतिक पाया आणि ज्ञानाधिष्टित शिक्षणाचा विचार केला पाहिजे. आजपर्यंत आपल्या देशात केवळ पाश्चिमात्य संकल्पनेवर काम होत राहिले, आता आपल्या देशासाठी आवश्यक शिक्षणाचा विचार झाला पाहिजे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अपेक्षित असलेले योगदान संस्था निश्चितच देईल,” असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आज व्यक्त केला.

संस्थेच्या १६० व्या वर्धापनदिनानिमित्त संस्थेच्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी संस्थेचे संस्थापक आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे, लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि मा. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव भट आणि मा. अभय क्षीरसागर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू मा. डॉ. एन.एस. उमराणी व संस्थेचे हितचिंतक, देणगीदार व संस्थेचे माजी विद्यार्थी, ‘सावली’ संस्थेचे संस्थापक मा. श्री. वसंत ठकार व त्यांचे सहकारी तसेच संस्थेच्या नियामक मंडळाचे आणि आजीव सदस्य मंडळाचे सदस्य, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थितांचे स्वागत करताना संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे म्हणाले की, संस्थेच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षपूर्तीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग आणि सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग मंत्री मा. श्री. नितीन जी गडकरी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री मा. डॉ. रमेश पोखरियाल जी ‘निशंक’ यांच्या ऑनलाईन व्याख्यानांचा लाभ सर्वांना मिळाला. या व्याख्यानांमुळे संस्थेच्या कार्याची माहिती देशपातळीवर पोहोचण्यास मोठी मदत झाली. यानिमित्ताने संस्थेच्या कार्याला मिळालेली प्रसिद्धी उत्साहवर्धक आहे.

संस्थेचे एक हितचिंतक, देणगीदार व संस्थेचे माजी विद्यार्थी, ‘सावली’ संस्थेचे संस्थापक मा. श्री. वसंत ठकार यांनी यावेळी संस्थेला भरघोस निधी दिला. संस्थेच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना ते म्हणाले की, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कामाचा विस्तार फार मोठा असला तरी त्यात एकोपा आहे. त्यामुळेच मी परत एकदा संस्थेशी जोडला गेलो. संस्थेचे अध्यक्ष भूषणजी गोखले आजदेखील नवीन विषय शिकण्याचा संकल्प करत आहेत यावरून शिक्षण कधीच संपत नसते, ते निरंतर चालूच राहाते हे स्पष्ट होते. आजकाल आपल्या पालकांची विचारपूस देखील न करण्याच्या काळात १६० वर्षांपूर्वी संस्थेची स्थापना करणाऱ्या संस्थापकांचे स्मरण आणि अभिवादन करत आहे, हे विशेष आहे.

संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे आपल्या भाषणात म्हणाले की, संस्थेने भविष्याकडे वाटचाल करताना आता ‘Good Education & Good Governance’ चा अंगीकार केला पाहिजे. १६० वर्षांपूर्वी १०x १० फूट आकाराच्या खोलीत मराठी विषयाच्या वर्गाच्या रुपाने सुरू झालेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कार्याचा विस्तार ७० पेक्षा अधिक शाखा आणि असंख्य विषय शिकवण्यापर्यंत झाला आहे. या सर्व कार्याच्या इतिहास लेखनाचे काम साडेतीन वर्षांपूर्वी सुरू झाले आणि आज ते पूर्णत्वास गेले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू मा. डॉ. एन.एस. उमराणी यांनी विद्यापीठाच्या वतीने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “आपल्या संस्थापकांच्या विचारसरणीच्या आधारे दैदिप्यमान आणि वैभवशाली वाटचाल करणाऱ्या या संस्थेचा एक भाग असल्याचा खूप अभिमान वाटतो. मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचा प्राचार्य म्हणून काम करताना महाविद्यालयाला शैक्षणिक आणि वैचारिक उंची देण्याचा प्रयत्न केला. उद्योग जगताशी समन्वय साधला. त्यातून वाणिज्य विषयक शिक्षणाचे मॉडेल निर्माण झाले. केवळ नोकरी आणि व्यवसायासाठी उपयोगी शिक्षण न देता जीवनाची उंची वाढवण्यासाठी संस्थेने केलेल्या परिश्रमाची फळे आज दिसत आहेत.”

संस्थेचे उपाध्यक्ष मा. प्रदीप नाईक यांनी या प्रसंगी बोलताना, शेतीच्या तंत्रज्ञानाकडे वळण्याची गरज व्यक्त केली. कोरोना महामारीमुळे अनेक गोष्टींचे महत्त्व लक्षात आले. आपल्या देशातील ७० टक्के लोकसंख्या आजही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतीच्या तंत्रज्ञानाचे महत्व अधोरेखित होते. संस्थेच्या संस्थापकांनी स्वदेशी शिक्षण, स्वावलंबी आणि देशप्रेमाने भारलेला समाज निर्माण करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले होते. त्यांचे हे हेतू आजदेखील तितकेच संयुक्तिक आहेत, असे ते म्हणाले.

संस्थेचे माजी सचिव मा. प्रा. आर. व्ही. कुलकर्णी, संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य डॉ. अतुल कुलकर्णी आणि संस्थेच्या मुख्य कार्यालयातील निवृत्त अधिकारी श्री. वामन शेंड्ये यांनी संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त संस्थेला निधी दिला.

संस्थेचे साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *